नवी मुंबई : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने याचा मोठा फटका कांदा निर्यातदारांना (Onion Export) बसला आहे. विदेशात निर्यात होणाऱ्या कांद्याचे 130 ते 140 कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्ट  (जेएनपीटी) बंदरात अडकून पडले आहेत. अचानक निर्यात शुल्क लावल्याने विदेशात जाणाऱ्या कांद्याची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे विदेशातील व्यापार्यांनी कांदा घेण्यास नकार दिल्याने निर्यातीसाठी आलेला कांदा जेएनपीटी बंदरात पडून आहे. 


जेएनपीटी बंदराप्रमाणे नाशिकमध्ये सुद्धा निर्यातीचा कांदा खोळंबला आहे. पुढील दोन दिवसांत यावर निर्णय न झाल्यास कंटेनर मधील कांदा सडून व्यापारी, शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसान होणार आहे. भारतातून आशियायी देशात महिन्याला साधारण 2500 हजार कंटेनरची निर्यात होत असते. मात्र आता केंद्र सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे कांदा निर्यातीला मोठा फटका बसणार असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


नाशिकनंतर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद राहणार?



कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांनी  कांदा विक्री बंद केली आहे. शेतकरी वर्गाला पाठिंबा देण्यासाठी आता नवी मुंबई  (Navi Mumbai)कृषी बाजार उत्पन्न समितीमधील (APMC) कांदा-बटाटा मार्केट बंद होण्याची शक्यता आहे. वाशीतील कांदा बटाटा मार्केट बंद झाल्यास याचा परिणाम शहरवासीयांवर होणार आहे. आधीच कांद्याचे दर कमी असून निर्यात शुल्क वाढवल्याने स्थानिक बाजारपेठेत कांदा आवक वाढणार आहे. असे झाल्यास सध्या 18 ते 22 रूपये किलोने विकला जाणारा कांदा 10 रूपयांच्या आत येवू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी शेतकऱ्यांबरोबर व्यापारी वर्ग करीत आहे.


नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, 14 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील 14 समित्यांवरील लिलाव (Bajar Samiti) आज बेमुदत बंद ठेवलेले आहेत.


केंद्र सरकारने (Central Government) कांद्याचा निर्यात शुल्क वाढवून 40 टक्क्यांवर नेल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) आणि व्यापारी आक्रमक झाल्यात सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीमध्ये घट होणार आहे. यामुळे पुढच्या काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर कमी होण्याची भीती आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आणि निषेधार्थ आज पासून नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या लासलगाव (Lasalgaon Bajar Samiti) येथील बैठकीत निर्णय झाला.