Agriculture news : सध्या देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. कमी पावसाचा परिणाम शेती पिकांवर होताना दिसत आहे. यावर्षी तांदळाच्या उत्पादनात पाच टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त इकोनॉमिक टाइम्सने दिले आहे.  कारण पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळं तांदूळ उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


कमी पावसामुळे भात पिकांच्या पेरणी आणि वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळं तांदूळ उत्पादनाबाबत चिंता निर्माण झाली आहे. याव्यतिरिक्त, एल निनो आणि प्रतिकूल हवामानामुळे चालत आलेल्या FY24 मध्ये जागतिक तांदूळ उत्पादनात अंदाजे 7 दशलक्ष टन तूट झाल्यामुळं जागतिक तांदळाच्या किंमती वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.


सरकारनं चालू खरीप हंगामात 521.27 लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी खरीप हंगामात 496 लाख टन तांदूळ खरेदी करण्यात आली होती. खरीप (उन्हाळी-पेरणी) आणि रब्बी (हिवाळी-पेरणी) या दोन्ही हंगामात भात पीक घेतले जाते. केंद्रीय अन्न मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये 122 लाख टन, छत्तीसगडमध्ये 61 लाख टन, तेलंगणा 50 लाख टन, ओडिशा 44.28 लाख टन, उत्तर प्रदेश 44 लाख टन तांदूळ खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हरियाणामध्ये 40 लाख टन, मध्य प्रदेशमध्ये 34 लाख टन, बिहारमध्ये 30 लाख टन, आंध्र प्रदेश 25 लाख टन, पश्चिम बंगालमध्ये 24 लाख टन आणि तामिळनाडूत 15 लाख टन तांदूळ खरेदीचं उद्दीष्ट आहे. दरम्यान, 203-24 मध्ये राज्यांकडून 33.09 लाख टन भरड धान्य खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022-23 च्या तुलेनेत यावर्षी खरेदीत मोठी वाढ करण्यात येणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


kharif season Rice : सरकारनं तांदूळ खरेदीचं लक्ष्य वाढवलं, खरीप हंगामात करणार 521.27 लाख टन तांदूळ खरेदी