Sharad Pawar : सेंद्रिय शेती (organic farming) संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार करणार असल्याचे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीमध्ये उत्पादनाबरोबर मार्केटिंगचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्याची विश्वासार्हता अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे शरद पवार म्हणाले. महाऑरगॅनिक अँड रेसिड्यूफ्री फार्मर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य अर्थात मोर्फाच्या वतीनं सेंद्रिय आणि विषमुक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळई शरद पवार बोलत होते. 


विषमुक्त मालाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार 


शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजेत असेही शरद पवार म्हणाले. मोर्फा संघटना राज्यात विषमुक्त आणि सेंद्रिय शेतीतील प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणत आहे. सेंद्रिय आणि विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी आपण संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन सेंद्रिय आणि विषमुक्त मालाचे उत्पादन वाढविणे आणि मार्केटिंग करण्यासाठी मदत करु असेही शरद पवार म्हणाले. जगभरात सेंद्रीय आणि विषमुक्त शेतीमालाचे महत्त्व वाढत आहे. सदर उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी मोर्फा संघटनेच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारबरोबर चर्चा करुन प्रश्नांची सोडवणूक करु असे जयंत पाटील म्हणाले. 


डाळिंब आणि द्राक्षे पिकांच्या वाहतुकीला सवलत मिळणं गरजेचं


सेंद्रिय आणि विषमुक्त शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेत आहेत. पण मार्केटिंगमध्ये शासनाच्या मदतीची अत्यंत गरज असल्याचे मत मोर्फा संघटनेचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे म्हणाले. डाळिंब, द्राक्षे यासारख्या फळ पिकांची निर्यात करण्यासाठी त्याच्या वाहतुकीवर सवलत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांना प्रीमियम रेट मिळू शकतो. कोविडनंतर या तीन वर्षापासून जहाजाच्या वाहतुकीमध्ये चार पट वाढ झालेली आहे. निर्यातीसाठीचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळं आपले डाळिंब निर्यातीत अडचणी येत असून चांगल्या क्वालिटीच्या डाळिंबाला चांगला भाव मिळणे अवघड झाले आहे. नैसर्गिक शेती पेक्षा आम्हाला कमर्शियल ऑरगॅनिक फार्मिंग करणे अत्यंत गरजेचे असल्याचे पडवळे यांनी सांगितले.


दुधाला योग्य किंमत मिळण्यासाठी सरकारडे पाठपुरावा करणार : अंकुश पडवळे


सेंद्रिय शेती बरोबर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. विषमुक्त आणि अँटोबायोटिक फ्री दूध उत्पादन काळाची गरज असून, अशा दुधाला योग्य किंमत मिळण्यासाठी शासन आणि खासदार शरद पवार यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू राहील असे अंकुळ पडवळे म्हणाले. दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्यासाठी मुख्यमंत्र्याबरोबर राज्यातील दूध उत्पादकांची बैठक घेण्याची मागणी कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी दूध उत्पादकांच्या शिष्टमंडळासह लेखी निवेदनाद्वारे केली. त्यावेळी खासदार पवार यांनी मुख्यमंत्र्याबरोबर लवकरच भेट घडवून आणण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


kharif crop : खरीप पिकांच्या लागवडीत वाढ, कृषी मंत्रालयानं दिली माहिती; भात लागवडीत मोठी वाढ होऊनही निर्यातबंदी