पुण्याच्या ग्रामीण भागात शाळा सुरु; उरुळी कांचन येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांना काय वाटतं?
राज्य सरकारने शाळा उघडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आजपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून शाळांना काही नियम आणि अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय व जुनियर कॉलेज या शाळेतही जय्यत तयारी करण्यात आली आहे.. शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटल ठेवण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्स मेन्टेन करण्यासाठी बेंचवर विद्यार्थ्यांचे नाव टाकण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी एका दिवशी मुले तर एका दिवशी मुली येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षकांचीही covid-19 ची चाचणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्व शिक्षक हे निगेटिव्ह आहेत. एकंदरीत या विद्यालयात लॉकडाऊननंतरची शाळा उघडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.