Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Raj Thackeray on BMC Election 2026: मुंबईचा विकास होईल. पण मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहण्याची गरज आहे. मुंबईचं वर्णन 'स्टेट विदिन स्टेट' असे केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई ही मराठी माणसाच्या (Marathi Manus) हातात आहे. पण भविष्यात हे चित्र पूर्णपणे बदलून टाकण्याच्या हालचाली सुरु असल्याचा दावा, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. ते शुक्रवारी एबीपीच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी भविष्यात संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा कसा बदलला जाऊ शकतो, याची सविस्तर मांडणी केली. (Mumbai Mahanagarpaliaka Election 2026)
मला 2024 ते 2025 यादरम्यान एक व्यक्ती भेटली होती. त्या व्यक्तीने मला मुंबईत आगामी काळात होऊ घातलेल्या गोष्टी आणि आराखडा ऐकून मी हबकून गेलो. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांना इतका उशीर त्यासाठीच झाला. कारण राज्य सरकारला काही गोष्टी या प्रशासकामार्फत करुन घ्यायच्या होत्या. निवडणूक होऊन दुसऱ्या पक्षाचे सरकार आल्यावर त्रास नको म्हणून या सर्व गोष्टी आधीच करायच्या होत्या. केंद्र आणि राज्य सरकारचा सर्व फोकस हा एमएमआरए रिजनवर आहे. याचं छोटसं उदाहरण मी सांगतो. वाढवण बंदर झालं, ती गरज होती, हे मी समजू शकतो. पण आता वाढवण बंदराच्या बाजूला एअरपोर्टही होत आहे. वाढवण विमानतळ कशासाठी बांधले जात आहे तर इथून मुंबईचा कार्गोचा सगळा भाग तिकडे शिफ्ट केला जाईल. यानंतर नवी मुंबई विमानतळ उभारण्यात आले आहे तिकडे सध्या मुंबईतून होत असलेली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक शिफ्ट केली जाईल. सध्या मुंबई विमानतळाचा प्लॉट अदानींच्या ताब्यात आहे. वाढवण आणि नवी मुंबई विमानतळामुळे या विमानतळाची गरज संपुष्टात येईल. तसे झाली की धारावी आणि कलिना परिसराला लागून असलेला मुंबई विमानतळाचा प्लॉट अदानींना विकला जाईल. आपण हा सगळा परिसर गुगल मॅपवर पाहिल्यावर लक्षात येईल की, या भागात शिवाजी पार्कसारखी 50 ते 60 मैदान बसू शकतात. तोच प्लॉट राज्य सरकार विकायला काढणार आहे. मला 100 टक्के वाटते, सध्याच्या मुंबई विमानतळाच्या जागेची विक्री होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.