Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
नाशिक : शहर दत्तक घेतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी नाशिकचा किती विकास केला? भाजपने फक्त जाती धर्माच्या नावे लोकांना भुलवलं आणि सत्ता मिळवली. तपोवनाती झाडे छाटायच्या आधी यांनी त्यांच्या पक्षातील निष्ठावंतांना छाटलं अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली. भविष्यात तुमच्या मुलांना पश्चाताप होऊ नये, 1500 रुपयांसाठी आपले आई-वडील विकले गेले असं म्हणू नये अशी जर इच्छा असेल तर शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांना निवडून द्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा ही नाशिकमध्ये झाली.
Raj Thackeray Nashik Speech : राज ठाकरेंच्या भाषणाचे मुद्दे
महाराष्ट्रात साठ-सत्तर नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यासाठी किती पैसा खर्च केला? कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. इतके पैसे कुठून येतात?
1952 मध्ये स्थापन झालेल्या जनसंघाला 2026 मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते होते ना, मग बाहेरून का घेता? एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हे ठिक आहे, पण सगळीकडेच हे सुरू. त्यातून तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त कामंच करायची.
झाडांच्या आधी पक्षातील लोक छाटले
लाकुडतोड्या बरा होता. त्याला देवीने विचारले सोन्याची, चांदीची कुऱ्हाड होती का? त्यालाही तो भाळला नाही. पण यांनी तपोवनातील झाडं छाटायच्या आधी पक्षातील लोकं, कार्यकर्ते छाटली आणि आता बाहेरून लोक आणली जातात.
नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी नाशिकला दत्तक घेतो असं सांगितलं. त्यांच्या सांगण्याला नाशिककर भुलले आणि आम्ही सत्तेत असताना केलेली कामं विसरले. दत्तक घेणारे फडणवीस नंतर पुन्हा आलेच नाहीत.
2012 साली आमची सत्ता असताना त्यावेळी कुंभमेळा झाला. त्याचं नियोजन उत्तम करण्यात आलं. त्यासाठी एकही झाड कापलं नाही. त्यावेळच्या नगरसेवकांचा, प्रशासकांचा सत्कार झाला. मग आता काय झालं? भाजपचं आगोदरच ठरतं. कुंभमेळ्याच्या नावाखाली आता झाडं तोडायची, नंतर साधू परत गेल्यानंतर ती जागा उद्योगतपीच्या घशात घालायची. यांचं हे सगळं आधीच ठरलेलं असतं.