चार दिवसांनंतर कांद्याची कोंडी फुटली, लिलाव सुरु होताच कांद्याचे भाव घसरले

नाशिक : अखेर चार दिवसांनंतर कांदा कोंडी आज फुटली असून कांद्याचे लिलाव सुरू झाले. कांदा साठवणुकीवर केंद्र सरकारने निर्बंध लावले होते. होलसेल व्यापारी 25 टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांना 2 टन पेक्षा जास्त कांद्याची साठवणूक करता येत नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अघोषित लिलाव बंद ठेवले होते.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत व्यापाऱ्यांना कांदा लिलाव सुरु करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्या पाठोपाठ केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांना दिलासा देत कांद्याची खरेदी विक्री, प्रतवारी आणि पॅकेजिंग साठी 3 दिवसांची मुदत दिली आहे, त्यामुळे निर्बंध हटवले नसले तरी, कांदा लिलाव सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. आजपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव सुरळीत सुरू झाले.


केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांवर साठवणुकीवर निर्बंध घातल्याने 4 दिवसांपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत मधील कांदा लिलाव ठप्प झाले होते. अखेर मुख्यमंत्री आणि कांदा व्यापारी यांच्यात बैठक होऊन त्यांना लिलाव सुरू करण्यास सांगितल्यावर आजपासून जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू झाले. आज जास्तीस जास्त 5900 तर सरासरी 4700 रुपये भाव निघाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola