Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
BMC Election 2026: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. मुळातच दोन्ही पक्षांनी आणि त्यांच्या सर्वोच्च नेतृत्त्वाने ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नव्हती. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोघेही नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांप्रमाणे मैदानात उतरले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फारसे यश मिळालेली नाही. परंतु, राज्यातील आगामी 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. यापैकी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC Election 2026) मनसे आणि ठाकरे गटात जागावाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उद्यावर येऊन ठेपली तरी मनसे (MNS) आणि ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. जागावाटप होऊन उमेदवार जाहीर होण्यास उशीर झाल्यास प्रचारासाठी कमी वेळ मिळेल. याचा फटका संबंधित उमेदवाराला बसू शकतो. हाच धोका ओळखून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना जागावाटपाची चर्चा फार लांबवू नका, असा संदेश पाठवला आहे.
सध्या मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. प्रत्येक बैठक संपल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी जागावापट होऊन मनसे आणि ठाकरे गटाची युती जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक मराठीबहुल भागांमध्ये प्रभागांच्या वाटणीवरुन शिवसेना-ठाकरे गटात रस्सीखेंच सुरु असल्याची माहिती आता समोर आली आहे. दादर, शिवडी, माहीम, भांडूप, विक्रोळी या भागांमधील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. त्यामुळे जागावाटपाची चर्चा पुढे सरकताना दिसत नाही. मात्र, या सगळ्यामुळे युतीची घोषणा आणि उमेदवारांची निवड या सगळ्यात विलंब होत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जागावाटपात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एक महत्त्वाची सूचना केली आहे. ज्या मराठीबहुल परिसरात जागावाटपावरुन घोडे अडले आहे, त्याबाबत जास्त रस्सीखेच करु नका, असे राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि संजय राऊत व अनिल परब यांना सांगितले आहे. यानंतर दैनिक 'सामना'च्या कार्यालयात दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये संबंधित प्रभागांबाबत थेट चर्चा झाली. या चर्चेनंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी याबाबतची माहिती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. त्यामुळे आता या प्रभागांचा तिढा राज आणि उद्धव ठाकरे कसा सोडवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.