Monsoon Farmers : 50 ते 60 मिमी पावसाशिवाय पेरणी नको, हवामान खात्याचा शेतकऱ्यांना सल्ला
बुलेटिनच्या सुरवातीलाच बातमी अन्नदात्या बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची... महाराष्ट्रात तळकोकणासह काही भागांत मान्सून सक्रिय झालाय. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्यायत. त्यामुळे, बळीराजाने पेरणीची तयारी सुरू केलीय. मात्र, ५० ते ६० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला हवामान खात्याने दिलाय. त्याचसोबत, जमिनीत किमान सात इंच ओलावा होऊन वापसा आल्यावरच पेरणी करा, असं आवाहनही करण्यात आलंय. दरम्यान, आधीच लांबलेल्या पावसाने हजेरी लावल्यावर शेतकऱ्यांनी कुळव आणि तिफण शेतात नेण्याची तयारी सुरू केलीय. मात्र, आताच पेरणी केली, आणि पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं, असं हवामान विभागाने म्हटलंय.