ज्यांना कोकणानं नाकारलं ते माझी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली असं सांगतात : उदय सामंत

मुंबई : "गुप्त बैठक 200 लोकांसमोर होत नसते," असं सांगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रत्नागिरीत गुप्त भेट झाल्याचा इन्कार केला. बैठक बंद खोलीत झाली नाही, दाराआड झाली नाही, तर समोरासमोर झाली. त्यावेळी आरोप करणारे माझ्यासमोरच बसले होते. जी चर्चा झाली ती स्वागताच्या दृष्टीने झाली आणि सगळ्यांच्या समोर झाली, असं उदय सामंत म्हणाले. माजी खासदार निलेश राणे यांनी उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीतील विश्रामगृहात गुप्त भेट झाल्याचा दावा केला होता. त्यावर उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.

उदय सामंत म्हणाले की, "ज्या मंडळींना कोकणाने दोन वेळा नाकारलं आहे, त्यांनी माझं राजकीय अस्तित्त्व अस्थिर करण्यासाठी माझी गुप्त भेट झाली असं ट्वीट करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही. जनतेने त्यांची दखल घेतली नाही तर माझ्यासारख्या मंत्र्यांनी का घ्यावी? ज्याला गुप्त बैठक करायची आहे तो रत्नागिरी मतदारसंघात का करेल? रत्नागिरीच्या रेस्ट हाऊसमध्ये का करेल? 200 माणसांच्या समोर का करेल? गुप्त बैठक करायची असेल तर नागपूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई या ठिकाणी करेल. असे ट्वीट करुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावरील विश्वास उडेल असं जर त्यांना वाटत असेल तर हा बालिशपणा आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलणं मी सहसा टाळतो."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola