Thackeray Reunion | राज ठाकरे यांचा 'राजमंत्र', BMC निवडणुकीत युतीचे संकेत?

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना, “वीस वर्षांच्या नंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडताय?” असा सवाल केला. या विधानामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती, मात्र राज ठाकरे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले. त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार याद्या तपासण्याचे आणि जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचे आवाहन केले. मुंबई महानगरपालिकेत आपलीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या भावना व्यक्त झाल्याचे म्हटले, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास नांदवे यांनी युतीची प्रक्रिया सुरू असू शकते असे संकेत दिले. मुख्यमंत्र्यांनी मात्र कोणीही एकत्र आले तरी विजय महायुतीचाच होणार असल्याचा दावा केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola