Samruddhi Mahamarg Punctures | समृद्धी महामार्गावर खिळे ठोकले, कंपनीच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना मनस्ताप
समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या पंक्चर झाल्या. ब्रिजवर मोठ्या प्रमाणात विशिष्ट खिळे ठोकल्याचे दिसून आले. प्रथमदर्शनी हे खिळे चोरट्यांनी ठोकले असावे असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीनेच हे खिळे ठोकले होते, अशी माहिती समोर आली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना बॅरिकेडिंग का केले नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्यानंतर रात्री हे खिळे काढून टाकण्यात आले. ते दिवसा काढले असते तर लोकांना हा त्रास झालाच नसता. रात्री बारा ते तीन या वेळेत अनेक गाड्या पंक्चर झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. चोरट्यांनी गाड्या अडवून लुटण्याचे प्रकार यापूर्वीही समृद्धी महामार्गावरील सांगवी भागात घडले असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, या घटनेमागे कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.