पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी स्वत: लस का टोचून घेतली नाही?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा उदोउदो करीत आहेत. हा प्रकार म्हणजे, जुन्या काळात शिकारी लोक शिकारीनंतर असे ढोल बडवीत सर्व जंगलभर फिरत होते, तसाच हा प्रकार सुरु असल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ते अकोला येथे आपल्या निवासस्थानी 'यशवंत भवन' येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मोदी आणि ठाकरेंनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही?, असा सवालही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.