नवरात्रीत उस्मानाबाद जिल्ह्यात तीन दिवस जिल्हाबंदी, दोन डोस घेतलेल्यांनाच मंदिरात प्रवेश

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा साधेपणाने साजरा होणार आहे.  नवरात्र महोत्सवात  दररोज 60 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे तर नवरात्र काळात तीन दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे. या काळात तुळजापूर येथे संचारबंदीचे आदेश लागू असणार आहेत.

पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातन नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या तीन दिवसात एकही वाहन किंवा भाविक जिल्ह्यात येऊ दिला जाणार नाही.

पौर्णिमेच्या आगोदर एक दिवस, पौर्णिमेच्या दिवशी व पौर्णिमेनंतर एक दिवस असे तीन दिवस तुळजापूरात संचारबंदी असणार आहे. तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. 

नवरात्र काळात ज्या भाविकांनी कोरोना लसीचे 2 डोस पूर्ण केले आहेत त्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 29 सप्टेंबर रोजी होणार असून 7 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात देवीचा नवरात्र उत्सव होणार आहे त्यात 7 ऑक्टोबर घटस्थापना दिवशी पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी व परिसरात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार असुन सॅनिटायझर,मास्क, सोशल डिस्टन्स हे नियम पाळावे लागतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola