Maratha Reservation: मुख्यमंत्री आरक्षणाविरोधात, त्यांना आज मनापासून आनंद झाला असेल : नारायण राणे

मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवल्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका आहे. मराठा आरक्षण रद्द झालं याला महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री कारणीभूत आहे. मी शिवसेनेत अनेक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांना मराठा समजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यामुळे फक्त दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे अशी भूमिका उद्धव ठाकरे घेतायेत. त्यांना आज मनापासून आज आनंद झाला असेल, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.  

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मराठा समाजाला मोठा दुखद धक्का बसला आहे. मराठा समाजात मागासलेल्या लोकांना भारतीय घटनेनुसार आरक्षण देण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली त्याचवेळी संशय आला होता. तामिळनाडू आणि कर्नाटक दोन्ही राज्यात 52 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. मात्र मराठा आरक्षण रद्द करणे अत्यंत दुर्दैवी आहे, असं भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 
 
मराठा आरक्षणासंदर्भातील लढा आजही संपलेला नाही. मराठा समाज लढा सुरु ठेवणार आहे. काही जण बाहेरुन आरक्षण देतोय असं दाखवत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, भारतीय राज्य घटनेनुसार आम्ही लढू आणि आरक्षण मिळवू, असं नारायण राणे यांनी म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola