Sambhaji Raje | रायगड संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार; संभाजीराजेंचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन | ABP Majha
छत्रपती शिवाजी महाराजांची (हिंदवी स्वराज्याची) राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धानचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने 606 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संवर्धनाची काही कामं सुरळीत सुरु आहेत, मात्र महाड ते रायगड किल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या रोपवेच्या कामात दिरंगाई तसेच संबंधित विभागाचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी संभाजी राजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजे यांना संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.