Raj Thackeray writes to PM Modi | महाराष्ट्रात 100% लसीकरण गरजेचं; राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र
बई : महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचं असेल तर 100 टक्के लसीकरणाची गरज असल्याचं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. राज ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्री मोदी यांना पत्र लिहून केंद्राची मदत मागितली आहे. राज्यातील सर्व वयोगटातील 100 टक्के लोकांचं लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा असावा म्हणून राज्याला आवश्यक पावलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी," असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
स्थानिक परिस्थितीला अनुसरुन उपाययोजना आखण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन द्या
"महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती सर्वात बिकट आहे. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणं, लॉकडाऊन जाहीर करणं महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे या संसर्गाला तोंड द्यायचं असेल तर 100 टक्के लसीकरणाची गरज आहे. यासाठी कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी राज्याला केंद्राची साथ हवी आहे," असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच "आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही तर स्थानिक परिस्थितीला अनुसरुन योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच द्यावं," अशी विनंतीही केली.
राज ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केलेल्या प्रमुख मागण्या
"राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करु द्याव्या. हाफकिन आणि हिंदुस्तान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.