Maharashtra Corona : जमावबंदी की, रात्रीची संचारबंदी? मंत्रिमंडळाची बैठक सुरु ABP Majha

Cabinet Meeting : देशात तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आणि उपाययोजना करण्याचं आवाहनही वारंवार करण्यात येत आहे. अशातच जर रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध अटळ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढली तर रात्रीची संचारबंदी लावायची की, जमावबंदी लागू करायची? यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जाणार? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा आणि राज्यातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आजची मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या? याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साधेपणानं साजरे करा, असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. सत्ताधारी असो किंवा विरोधक, दोघांनीही रस्त्यावर येत आंदोलनं केली. त्यामुळं सर्वसामान्यांनाच कोरोनाची भिती आहे आणि राजकीय पक्षांना नाही? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. त्यामुळं प्रशासनाची जबाबदारी वाढली असून याबाबत उपाययोजना करणं आवश्यक आहे. 

हायकोर्टानंही चिंता व्यक्त केली आहे की, जर आत्ताच आपण काळजी घेतली नाही, तर पुन्हा कोरोनातचा उद्रेक होऊ शकतो. हळूहळू रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे विकेंडला होणाऱ्या गर्दीर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करा. रात्रीची संचारबंदी लागू शकते, असं आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढच्या महिनाभरासाठी काय नियमावली राज्य सरकार जारी करणार याकडे लक्ष असणार आहे. 

राज्यात पुन्हा एकदा काही जिल्ह्यांना पुरानं वेढलं आहे. अतिमुसळधार पाऊस आणि त्यामुळे उद्भवलेली पूरस्थिती यामुळे जिवीतहानीसोबतच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झालं आहे. यासारख्या नैसर्गिक आपत्तीबाबतही आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola