Mission Kavach Kundal : राज्य सरकारचं 'मिशन कवच कुंडलं'; दररोज 15 लाख लसीचे डोस देण्याचं उद्दिष्ट, आरोग्यमंत्र्यांची माहिती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMission Kavach Kundal : देशासह राज्यातही कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच देशात कोरोना लसीकरण मोहीमही राबवली जात आहे. अशातच आज घटस्थापनेच्या दिवशी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी 'मिशन कवच कुंडलं' (Mission Kavach Kundal)ची घोषणा केली आहे. दसऱ्यापर्यंत देशभरात 100 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं केंद्र सरकारचं उद्दीष्ट आहे. त्या दृष्टीकोनातून राज्यही प्रयत्नशील आहे. राज्यात दररोज 15 लाख लोकांना लस देण्याचं उद्दीष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. सध्या महाराष्ट्र सरकारकडे 1 कोटी लशींचा साठा असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
"15 ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत देशात 100 कोटी लसीकरण व्हावं, असं केंद्रानं ठरवलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र देशातल्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी नाही. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील माझ्याशी फोनवर चर्चा करून राज्याचा या 100 कोटींच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी आपण मिशन कवच कुंडल योजना 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राबवणार आहोत. रोज किमान 15 लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य आपण ठेवलं आहे. पूर्वी लस उपलब्ध नसायची तशी परिस्थिती आता नाही. या क्षणाला 75 लाख लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत. 25 लाख लसी आज उपलब्ध होतील. त्यामुळे 15 लाख लसीकरण रोज केलं तर 6 दिवसांत हा स्टॉक पूर्णपणे संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला दिलं आहे.", असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.