Devendra Fadnavis Uncut PC | गृह विभाग नेमकं कोण चालवतंय? अनिल देशमुख की अनिल परब? : देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवरही बोट ठेवलं आहे. अशातच गृहखातं कोण चालवतं? गृहमंत्री अनिल देशमुख की, शिवसेना नेते अनिल परब? असा परखड सवालही फडणवीसांनी उपस्थित केला आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जी माहिती दिली, ती म्हणजे सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न आहे, असा थेट आरोपही केला आहे.
विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "अँटिलियाच्या प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्या अटकेनंतर विविध प्रकारचे जे खुलासे होत आहेत, त्यानंतर कालच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेले खुलासे धक्कादायक आहेत. पण असा खुलासा करणारे परमबीर सिंह हे पहिले व्यक्ती नाहीत, यापूर्वी महाराष्ट्राचे डीजी सुबोध जयस्वाल यांनीही यांसदर्भातील एक रिपोर्ट राज्य सरकार आणि माननिय मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. पोलिसांच्या ट्रान्सफरमधील रॅकेट, पैशांची देवाण-घेवाण, त्यातली दलाली यासंदर्भातील संपूर्ण माहिती असणारा एक अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी सादर केला होता. हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता, त्यानंतर हा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला होता. पण तरिही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद सोडून केंद्रीय सेवेमध्ये गेले. त्याचं कारण होतं की, सर्व काही जयस्वाल यांनी उघडकीस आणून ही साधी चौकशी लावली गेली नाही."
"मुळात हे प्रकरण होतं यामध्ये महाराष्ट्राच्या इन्टेलिजन्सला फार मोठं बदल्यांचं रॅकेट सुरु आहे. काही दलाल पैसे खात असल्याचं समजलं. त्यामध्ये वारंवार गृहमंत्र्यांचं नाव येतंय, त्यांच्या ऑफिसचं नाव येतंय, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर थ्रू प्रॉपर चॅनल तेव्हाच्या कमिश्नर इन्टेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी डीजींना त्यासंदर्भातील रिपोर्ट सादर केला आणि डीजींच्या माध्यमातून तेव्हाचे डीसीएस होमची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन काही फोन त्यांनी सर्विलन्सवर लावले. त्या फोनमधून जे काही बाहेर पडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. म्हणून तो रिपोर्ट सादर झाला, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्यावर कारवाई झालीच नाही, तत्कालीन कमिश्नर इन्टेलिजन्सवरच कारवाई झाली. त्यांना पदावरुन दूर करण्यात आलं. त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावं आली होती, त्यातल्या अनेक लोकांना त्या-त्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.