Nana Patole : नाना पटोले यांच्यावर ठाकरे-अजित पवारांची पाळत? शिवसेना, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीत वाद आणि बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी दिल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत का? अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना महाविकास आघाडीतील अनेक नेते महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हणत होते. यामध्ये खुद्द नाना पटोले यांचाही समावेश होता. पण, नाना पटोले मतभेद नाहीत असं एकीकडे सांगत आहेत, तर दुसरीकडे मात्र अनेक वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. नाना पटोले यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळेही महाविकास आघाडीत मतभेद आहेत का?, असे प्रश्न निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही त्यांचा समाचार घेतला होता. लहान व्यक्तींवर मी बोलत नाही, असं भाष्यही शरद पवारांनी केलं होतं.