CM Uddhav Thackeray | राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय दिवसीय नुकसानग्रस्त भागांच्या दौऱ्यावर असून ते सध्या सोलापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला. नुकसानीच्या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
विरोधी पक्षाकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय, कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही. मला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही.' पुढे बोलताना त्यांनी नुकसानग्रस्त भागातील गावकऱ्यांना आश्वासन दिलं आहे ते म्हणाले की, 'तुम्हाला कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, नाराज करणार नाही. हे तुमचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्व जनतेचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही.'
'झालेल्या नुकसानाबाबत जी काही मदत करायची आहे. ती मदत करण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. सगळीकडे पंचनामे सुरु आहेत. सगळी माहिती घेतली जात आहे. तसचे ही माहिती आम्ही केवळ घेत बसणार नाही तसेच या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. जशी माहिती आमच्याकडे येईल तशी आम्ही मदतीला सुरुवातही करणार आहोत.', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळीराजाला आश्वासन दिलं आहे.