
Kisan Samman Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कृषी सन्मान योजनेचा निधी वर्ग
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या कार्यक्रमात 1 बटन दाबून 9 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 18 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांनी केला. पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. 2 हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते.
पीएम किसान सन्मान योजना लाँच केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यावर सरकारचा भर आहे. आमच्या सरकारने नव्या धोरणाने काम सुरु केले. शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यावर भर दिला. जगामध्ये काय नवे घडतेय, त्याची माहिती घेतली. सखोल अभ्यास केला आणि त्या दृष्टीने काम केले, असं ते म्हणाले.