नवी दिल्ली :  देवेंद्र फडणवीस त्यांच्या माहेरी येऊन गेले. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला पाहिजे. महाराष्ट्राची दिल्लीत 'खेलो हो बे' सुरु, त्यासाठी मनोरंजन टॅक्सही नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही या विषयाकडे गांभीर्याने न पाहता गंमत म्हणून पाहतो, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, दिल्लीत भिजलेले फटाके घेऊन वारंवार फोडण्याची सवय आहे. ते वाजत नाहीत. कोणत्याही अधिकाऱ्याचं आक्षेपार्ह संभाषण झालं असेल तर त्यासाठी महाराष्ट्राचे गृहखातं चौकशीसाठी सक्षम आहेत. फोन टॅपिंगच्या अहवालात काडीचाही दम नाही. त्याच्या तपास करण्यास राज्य सरकार सक्षम आहे.  


ते म्हणाले की, महाराष्ट्रात सीबीआयवर परमबीर सिंह यांच्या मागणीवर बंदी घातली. आता तेच परमबीर सिंह सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. आता विरोधी पक्षाचे लोकं कोणता सिनेमा बनवतात याकडे आमचे लक्ष आहे, असं राऊत म्हणाले. 


राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलिस आमची ताकत आहे. काही अधिकारी आहेत. भाजप आणि संघाशी संबंधित अधिकाऱ्यांची आमच्याकडे पक्की माहिती आहे. 


राजभवन हा राजकीय अड्डा झाला असेल तर त्यांच्यावर टीका होणारच त्यांना भाजप कार्यकर्ता का म्हणू नये? असा सवाल करत संजय राऊत म्हणाले की, राज्यपालांनी आपल्या पदाची गरीमा राखावी. अजून त्यांनी का 12 आमदारांबाबत निर्णय का घेतला नाही. भाजपच्या दबावानेच राज्यपाल 12 आमदारांची नावे घोषित करत नाहीयेत. भाजपचे काही कार्यकर्ते प्रशासनात तर काही राज्यभवनात आहेत. राज्यपालांना चांगली प्रतिमा हवी असेल तर त्यांनी संविधानानुसार कामं करावीत. संवैधानिक पदाचा दुरुपयोग कुणीही करु नये. भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना भेटावं. सरकार मुख्यमंत्री चालवतात. विरोधी पक्षनेते जर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील तर प्रश्न सुटतील. मुख्यमंत्री योग्य वेळ आल्यावर बोलतील असंही ते म्हणाले. 


ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात न्याय मिळत नाही असं देशाचे माजी सरन्यायाधीश  म्हणाले होते. न्याय मिळण्यासाठी काय काय करतात ते सगळ्यांसमोर आहे त्यामुळे आम्हाला फार अपेक्षा नाही