मुंबई : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election ) बिगुल वाजणार आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा देशाचा अंतरिम अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी एका मुलाखती दरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर देखील भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement


सध्या देशात तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टींवर मात केली जातेय. तसेच नवीन आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे  पुढील काही काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या देखील संकटात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावर निर्मला सीतारामन यांनी काय म्हटलं हे सविस्तर जाणून घेऊयात. 


AI मुळे नोकऱ्या जाणार?


हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, एआयला देखील माणसांची गरज आहे. एआय आपलं काम नाही करु शकत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एआयमुळे भविष्यात होणाऱ्या बेरोजगारीच्या शक्यतेवर भाष्य करताना काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचं देखील म्हटलं. तसेच ही तंत्रज्ञानाचा उपयोग करताना देखील माणसाची गरज भासते असंही यावेळी निर्मला सीताराम यांनी म्हटलं. 


एआयला आहे माणसाची गरज  - निर्मला सीतारामन


निर्मला सीतारामन यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटलं की, एआय सारखं चांगलं तंत्रज्ञान बनवणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये नोकरी करण्याची संधी क्वचितच उपलब्ध होऊ शकते. पण तरीही ती संधी ही मोठीच असेल. असं असलं तरीसुद्धा आपल्याला बेरोजगारीच्या मुद्द्यावर लक्ष द्यावं लागणार आहे, याबाबत शंका नाही. पण तुम्हाला असं वाटतं का की फक्त त्याच क्षेत्रात नोकऱ्या आहेत? असा प्रश्न देखील यावेळी निर्मला सीतारामन यांनी उपस्थित केला. एआयला देखील माणसाची गरज आहे. हे तंत्रज्ञान मानवाने विकसित केलं आहे. हे काही आपोआप चालणार नाहीये. त्यासाठी मानवाच्या हुशारीची गरज आहे. 


नोकरी या विषयावर लक्ष देणं आवश्यक - निर्मला सीतारामन 


निर्मला सीतारामन यांनी पुढे म्हटलं की, आपल्याला गुंतवणूकीची आवश्यकता आहे,तसेच नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करुन देणं देखील आवश्यक आहे. गुंतवणूक केल्याने थेट कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणार नाही. पण जर व्यवसायास वाव दिला तर व्यवसायाच्या माध्यामातून अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. 


ही बातमी वाचा :


Jio Brain : जिओने लॉन्च केला AI प्लॅटफॉर्म, 6G नेटवर्क विकसित करण्यासाठी होणार मदत