सातारा: सातारा जिल्ह्यातल्या अपशिंगे गावचा पैलवान अजिंक्य कदम हा साताऱ्याच्याच वृषाली शिंगटे-जाधवशी विवाहबद्ध होत आहे. या लग्नाचं वेगळेपण म्हणजे अजिंक्य कदमनं त्याला आहेरात येणारी रोख रक्कम कुंडलच्या अपघातग्रस्त पैलवानांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य म्हणून देण्याचा संकल्प केला आहे.


त्यासाठी आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला दिलेल्या पत्रिकेत, केवळ रोख आहेर देण्याची विनंती अजिंक्यनं केली आहे.

कुंडलच्या क्रांती संकुलातल्या पाच पैलवानांचं 12 जानेवारी रोजी कार अपघातात निधन झालं होतं.

सांगाती सामाजिक संस्था आणि कुस्ती-मल्लविद्या यांच्या सहकार्यानं त्या पाचही पैलवानांच्या कुटुंबियांसाठी सहाय्यता निधी उभारण्याचा अजिंक्यचा मानस आहे.

आपले दिवंगत आजोबा आणि पैलवान तुकाराम बापू कदम यांच्या स्मरणार्थ अजिंक्य स्वत:च्या खिशातूनही काही रक्कम या पैलवान सहाय्यता निधीत जमा करणार आहे.

अजिंक्यच्या या पुढाकाराने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता अनेक दानशूर व्यक्ती पुढे येऊन त्याला साथ देतील हीच अपेक्षा त्याला आहे.