T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकातील भारताचं (Team India) आव्हान संपुष्टात आलंय. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघाच्या कामगिरीवर चिखलफेक केली जातेय. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे.याचदरम्यान भारतीय संघाच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड समोर आलंय, ज्यात कोणत्या  खेळाडूनं संधीचं सोनं केलं. तर, कोणते खेळाडू फ्लॉप ठरले? याबाबत सांगितलं गेलं आहे. 


केएल राहुल
आयपीएलमध्ये गोलंदाजांचा समाचार घेणारा भारताचा सलामीवीर के एल राहुलला टी-20 विश्वचषकात काही खास कामगिरी करता आली नाही. सुपर 12 फेरीत बांग्लादेश आणि झिब्बाव्बेविरुद्ध सामन्यात त्यानं अर्धशतकं झळकावली. पण इतर सामन्यात त्याची बॅट शांतच दिसली. या स्पर्धेत राहुलनं सहा सामन्यात अवघ्या 128 धावा केल्या. तो पाकिस्तान विरुद्ध चार धावा, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 9 धावा आणि इंग्लंडविरुद्ध सामन्यात फक्त 5 धावा करून बाद झाला.


रोहित शर्मा
भारताचा कर्णधार रोहित शर्मा संपूर्ण टी-20 विश्वचषकात संघर्ष करताना दिसला. या स्पर्धेतील सहा सामन्यात त्याला फक्त 116 धावा करता आल्या. एवढंच नव्हे तर, इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात रोहित शर्मानं चुकीचं नेतृत्व आणि प्लेईंग इलेव्हन निवडल्याची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत रोहित शर्मानं भारताचा स्टार आणि अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहललं प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली नाही. 


विराट कोहली
जवळपास तीन वर्षानंतर फॉर्म आलेल्या विराट कोहलीनं टी-20 विश्वचषकातही चांगली कामगिरी बजावली. या स्पर्धेत विराट कोहलीनं सहा सामन्यात 296 धावा केल्या. ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं पाकिस्तानविरुद्ध सामन्यात 82 धावांची नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. विराटची ही खेळी अवस्मरणीय ठरली. 
 
सूर्याकुमार यादव
भारताच्या मधल्या फळीचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं या स्पर्धेत आपली चमक दाखवली. सूर्यानं मैदानाच्या चारही दिशी फटकेबाजी करत गोलंदाजाच्या नाकी नऊ आणले. या स्पर्धेतील त्यानं 239 धावांचा टप्पा गाठला. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु, इंग्लंडविरुद्ध सामन्यात तो स्वस्तात बाद झाला.


हार्दिक पांड्या 
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्यानं गोलंदाजीसह फलंदाजीतही महत्वाची भूमिका बजावली. पण भारताला टी-20 विश्वचषक जिंकून देण्यास तो अपयशी ठरला. हार्दिकनं सहा सामन्यात आपल्या बॅटनं 128 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करत आठ विकेट्सही घेतल्या. अशाप्रकारे हा विश्वचषक हार्दिक पांड्यासाठी संमिश्र ठरला.


दिनेश कार्तिक 
आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर भारताचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकनं भारतीय संघात स्थान मिळवलं होतं. त्यानंतर भारताच्या द्विपक्षीत मालिकेत त्यानं चमकदार खेळ दाखवला. ज्यामुळं टी-20 विश्वचषकात त्याची निवड करण्यात आली. या स्पर्धेत दिनेश कार्तिकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात होती. पण त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. सुरुवातीच्या चार सामन्यात त्याला फक्त 14 धावा करता आल्या. ज्यामुळं झिम्बाब्वे आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध सामन्यातून त्याला वगळण्यात आलं. 


ऋषभ पंत 
दिनेश कार्तिकला चार सामन्यांत संधी दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं झिम्बाब्वेविरुद्ध ऋषभ पंतला संधी दिली. मात्र, पंतला या संधीचा सोनं करता आलं नाही. या सामन्यात तो अवघ्या 3 धावा करून माघारी परतला. त्यानंतर सेमीफायनल सामन्यात हार्दिक पांड्याची विकेट्स वाचवण्यासाठी ऋषभ स्वत: रनआऊट झाला. ऋषभनं दोन सामन्यात फक्त 9 धावा केल्या. 


रविचंद्रन अश्विन
भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनकडून कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघ व्यवस्थापनाला मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यानं सर्वांनाच निराश केलं. टी-20 विश्वचषक 2022च्या सहा सामन्यांमध्ये अश्विनला बॅटनं फक्त 6 धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याला केवळ सहा विकेट घेतल्या. भारताला विकेट्सची आवश्यकता असताना अश्विन कर्णधार रोहित शर्माच्या विश्वासाला खरा उतरू शकला नाही. तज्ज्ञांच्या मते, या स्पर्धनंतर अश्विनसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वाटचाल खडतर होणार आहे.


अक्षर पटेल
भारताचा ऑलराऊंडर अक्षर पटेलकडं मोठे फटके मारण्याची क्षमता असल्यानं त्याचा संघात समावेश करण्यात आलाय. मात्र, या संपूर्ण स्पर्धेत अक्षर पटेलची बॅट शांत दिसली. याशिवाय, गोलंदाजीत काही खास कामगिरी करू शकला नाही. या स्पर्धेत अक्षरच्या बॅटीमधून फक्त 9 धावा निघाल्या. तर, तीन विकेट्स घेतल्या. 


भुवनेश्वर कुमार
स्विंग किंग म्हणून ख्याती असलेल्या भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं पॉवर प्लेमध्ये विरुद्ध संघाच्या फलंदाजाचे हात बांधून ठेवले. पण, टी-20 क्रिकेटमध्ये विकेट घेतल्याशिवाय विरुद्ध संघावर दबाव निर्माण केला जाऊ शकत नाही. या स्पर्धेत भुवनेश्वर कुमारनं सहा सामन्यात फक्त चार विकेट्स घेतले.  


मोहम्मद शमी 
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळं मोहम्मद शामीसाठी प्लेईंग इलेव्हनचे दरवाजे उघडले. पण तो जसप्रीत बुहराहची जागा भरून काढण्यास अपयशी ठरला. शामीला सहा सामन्यात फक्त सहा विकेट्स घेता आल्या. 


अर्शदीप सिंह
भारताचा युवा वेगवान डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंह इतर गोलंदाजाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. पण सेमीफायनल सामन्यात रोहित शर्मानं त्याच्याकडून फक्त दोन षटक टाकून घेतल्या. अर्शदीपनं संपूर्ण स्पर्धेतील त्याच्या पहिल्या षटकात विकेट्स घेतल्या आहेत. परंतु, इंग्लंडविरुद्ध सामन्यात तो अपयशी ठरला. या स्पर्धेत अर्शदीप सिंह सहा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. 


हे देखील वाचा-