Team India Playin 11 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 5 विकेट्सने पराभूत केलं. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) टीम इंडियाच्या प्लेईंग-11 मध्ये तीन महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या तीन सामन्यांतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरी पाहता त्याने हा सल्ला दिला आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना हरभजन म्हणाला, 'टीम इंडियाला आता काही मोठे निर्णय घ्यावेच लागतील. केएल राहुल उत्तम खेळाडू आहे. हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण सध्या तो त्याच्या खराब फॉर्मशी झगडत असेल तर त्याच्या जागी ओपनिंगमध्ये ऋषभ पंतला संधी द्यायला हवी असे मला वाटते.'


'पंतला संधी द्या'


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाठीला दुखापत झाल्याने दिनेश कार्तिकला सामन्याच्या मध्येच बाहेर जावे लागले होते. त्याच्या जागी ऋषभ पंतने उर्वरित सामन्यात विकेटकीपिंग केले. यावर बोलताना हरभजन म्हणाला, 'कार्तिक जखमी दिसत आहे. त्याची स्थिती काय आहे हे मला माहीत नाही. जर तो तंदुरुस्त नसेल तर ऋषभ पंत विकेटकीपर म्हणून टीम इंडियासाठी संघात येऊन राहुलच्या जागी खेळू शकतो. तसंच मधल्या फळीत कार्तिकऐवजी दीपक हुडा फलंदाजीची धुरा सांभाळू शकतो. तसंच तो एक अतिरिक्त फिरकी गोलंदाजाचा पर्यायही संघाला देतो.


आर अश्विनच्या जागी युझवेंद्र चहल


हरभजन तिसरा बदल सूचवताना म्हणाला,'अश्विनऐवजी युझवेंद्र चहलला संधी द्यायला हवी. तो विकेट घेणारा गोलंदाज आहे. चहल हा सामना जिंकणारा गोलंदाज आणि T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. संघात त्याच्यापेक्षा चांगला लेग स्पिनर आहे असे मला वाटत नाही. त्याला प्लेईंग-11 मध्ये न घेणे ही मोठी चूक आहे. असंही हरभजन म्हणाला.


उर्वरीत सामने टीम इंडियासाठी महत्त्वाचे


स्पर्धेत भारताला रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला 5 विकेट्सच्या फरकाने सामना गमवावा लागला. दरम्यान या पराभवामुळे भारताचं गुणतालिकेत पहिलं स्थानही गेलं असून आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ज्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून आरामात सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण सोबतच इतर संघ कशी कामगिरी करतील हे देखील महत्त्वाचं असेल. शिवाय ऑस्ट्रेलियात पावसाचा व्यत्यय सामन्यांमध्ये येत आहे, भारताच्या उर्वरीत दोन सामन्यातही पाऊस आला आणि सामने झाले नाहीत, तर देखील भारताचं पुढे जाणं अवघड होऊ शकतं. 


हे देखील वाचा-


T20 World Cup 2022 : जे 2011 मध्ये घडलं, तसंच यंदाही घडतंय, पुन्हा इतिहास घडणार, भारत विश्वचषक जिंकणार?