मुंबई : भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेल्या युवराज सिंहने आपल्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. '2019 पर्यंत मी क्रिकेट खेळत राहीन. त्यानंतर मी पुढचा निर्णय घेईन.' असं युवराज सिंह म्हणाला.


युवराज भारतासाठी शेवटचा वन डे सामना जून 2017 मध्ये खेळला होता. त्यामुळे भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी युवराजचं लक्ष सध्या यंदाच्या आयपीएल मोसमावर आहे. कारण आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन केल्यास युवराज 2019 च्या विश्वचषकासाठी आपली दावेदारी पेश करु शकेल.

याबाबत बोलताना युवराज म्हणाला की, 'मला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. आयपीएल माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण की, यामुळे 2019 पर्यंत खेळण्याची दिशा ठरवता येईल. मला 2019 पर्यंत खेळायचं आहे. त्यानंतरच मी पुढचा निर्णय घेईल.'

युवराजची कारकीर्द ऐन भरातच असताना त्याला कॅन्सरने गाठलं. पण त्यावरही मात करत तो पुन्हा मैदानावर परतला. पण ज्याप्रमाणे 2011 च्या विश्वचषकात त्याने कामगिरी केली होती. तशी कामगिरी करण्यात किंवा त्यात सातत्य ठेवणं त्याला जमलं नाही.

माझा कारकीर्दीतील पहिली सहा ते सात वर्ष मला कसोटी क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाली नाही. कारण तेव्हा कसोटी संघात उत्कृष्ट खेळाडू होते. जेव्हा मला संधी मिळाली त्याचवेळी मला कॅन्सरनं गाठलं. त्यामुळे कसोटी संघात स्थान न मिळवल्याचं दु:ख मला कायमच राहिल. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात.' असंही युवराज यावेळी म्हणाला.

त्यामुळे 2019 पर्यंत युवराज क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.