आमची फलंदाजी चांगली झाली नाही : कोहली
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2017 12:18 PM (IST)
'जेव्हा परिस्थिती तुमच्यासोबत नसते त्यावेळी मैदानावर तुम्हाला 120 टक्के कामगिरी करावी लागते. हाच अॅट्यिट्यूड महत्त्वाचा आहे आणि टीम देखील हेच करण्याचा प्रयत्न करते.'
गुवाहटी : दुसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवाला कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजांना जबाबदार धरल आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. 'मला वाटत नाही की, आमची फलंदाजी चांगली होती. सुरुवातीला आम्ही थोडं अडखळलो. त्यांनाही सुरुवातीला फलंदाजी करताना त्रास झाला. पण दव पडल्यानंतर त्यांनी सामना आमच्या हातून खेचून घेतला. जेव्हा परिस्थिती तुमच्यासोबत नसते त्यावेळी मैदानावर तुम्हाला 120 टक्के कामगिरी करावी लागते. हाच अॅट्यिट्यूड महत्त्वाचा आहे आणि टीम देखील हेच करण्याचा प्रयत्न करते.' असं कोहली सामन्यानंतर म्हणाला. दरम्यान, यावेळी कोहलीनं ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडोर्फचं कौतुक केलं. बेहरनडोर्फनं 4 षटकात 21 धावा देऊन 4 बळी घेतले. तोच या विजयाचा शिल्पकार ठरला दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत भारताला 118 धावांमध्येच रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं हे आव्हान 15 षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात सहजपणे पार केलं.