मुंबई : आपल्या अनोख्या ट्विट्ससाठी वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. मात्र आज अमरनाथ यात्रेसाठी जात असताना झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांसाठी वीरुनं ट्विट केलं आहे. वीरुनं आपल्या ट्विटमधून त्याच्यातील संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे.


"जेव्हा मुलगा सैन्यात भरती होऊन शहीद होतो, तेव्हा त्याची आई रडते. जेव्हा धार्मिक क्षेत्रावर दहशतवादी हल्ला होतो, आणि आईचा मृत्यू होतो, तेव्हा मुलगा रडतो, देव करो आणि अशी वेळ कुणावरही न येवो" असं वीरुनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/virendersehwag/status/884671290182729728

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 12 भाविक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये पोलिसांच्या पथकावरही हल्ला केला.

केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत मोठे-मोठे दावे केले होते. भाविकांसाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. या यात्रेत 100 पेक्षा अधिक भाविकांना लक्ष्य केलं जाऊ शकतं, असं 25 जुलैच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात स्पष्टपणे सांगितलं होतं. तरीही सुरक्षेत हलगर्जीपणा करण्यात आला का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.