डर्बी : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारतानं 36 धावांनी ऑस्ट्रेलियावर दणदणीत मात करुन फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयाची शिल्पकार ठरली ती हरमनप्रीत कौर. तिने 115 चेंडूत 171 धावांची स्फोटक फलंदाजी केली. हरमनप्रीतनं 12 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 90 चेंडूत शतक झळकावलं.


हरमनप्रीत कौर टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागला आपला आदर्श मानते. कारण की, सेहवागचं गोलंदाजावर तुटून पडणं तिला आवडतं आणि म्हणूनच ती त्याला आपला आदर्श मानते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिनं अशीच स्फोटक फलंदाजी करत अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक साजरं केलं.

शतक झळकावल्यानंतर तिने आणखी जोरदार आक्रमण करत ऑस्ट्रेलियाला अक्षरश: नामोहरम करुन सोडलं. कारण की, त्यानंतरच्या 71 धावा तिनं फक्त 25 चेंडूंमध्ये केल्या. ज्यामध्ये 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.

पंजाबच्या मोगामध्ये 8 मार्च 1989 रोजी जन्मलेली हरमनप्रीत कौरला क्रिकेटशिवायच सिनेमा, गाणी आणि कार चालवण्याची हौस आहे. हरमनप्रीत कौरनं पहिला आंतरराष्ट्रीय सामना 2009 साली खेळली. 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध विश्वचषक सामन्यात शतक झळकावून आपल्यातील चुणूक दाखवून दिली होती.

तिच्या याच आक्रमक शैलीमुळे बिग बॅश लीगमधील तीन-तीन संघ तिच्यासोबत करार करु इच्छित होते. पण शेवटी तिने सिडनी थंडर्सची निवड केली.

2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका टी-20 सामन्यात देखील हरमनप्रीतनं अशीच कामगिरी केली होती. तेव्हा तिनं 31 चेंडूत 46 धावा करत कांगारुंवर विजय मिळवून दिला होता.