कोलकाता : विजयरथावर सवार असलेली टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. अडीच महिन्यांनंतर टीम इंडिया पुन्हा एकदा श्रीलंकेशी भिडणार आहे. ज्यामध्ये भारत श्रीलंकेला पराभवाची धूळ चारण्यास उत्सुक असेल.


या सामन्यात विराट कोहली विजयासोबतच आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक सौरव गांगुलीला विराट कोहली या सामन्यात मागे टाकणार आहे.

कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट पाचव्या स्थानावर आहे. मात्र कोलकाता कसोटीत 2 धावा करताच तो गांगुलीला मागे टाकणार आहे. विराटने कर्णधार म्हणून 29 कसोटी सामन्यांमध्ये 59.53 च्या सरासरीने 2560 धावा केल्या आहेत.

कर्णधार असताना सौरव गांगुलीने 49 कसोटी सामन्यांमध्ये 37.66 च्या सरासरीने 2561 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आहे. त्याने 60 कसोटी सामन्यांचं नेतृत्व करत 3454 धावा केल्या आहेत.

भारताने श्रीलंकेला यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये त्यांच्याच मैदानावर कसोटी मालिकेत 3-0 ने मात दिली होती. यावेळी भारत मायदेशातच श्रीलंकेशी भिडणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवरुन या मालिकेची सुरुवात होईल.