मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कायमच चर्चेत असतो. मग मैदानावरील त्याचा खेळ असो किंवा अनुष्कासोबतचं नातं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही त्याच्याविषयी जाणून घेण्यात बराच रस असतो. दरम्यान, नुकतंच गौरव कपूरला दिलेल्या एका मुलाखतीत विराटनं आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी दिलखुलासपणे सांगितल्या.

अनुष्का माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं जीवन बरंचस बदललं अशी प्रामाणिक कबुलीही यावेळी कोहलीनं दिली. मुलाखतीदरम्यान विराट सांगितलं की, 'अनुष्कासोबत असणारं नातं याबाबत मी सर्वात आधी झहीर खानला सांगितलं होतं. त्याच्या सल्ल्यामुळेच अनुष्का आणि माझं नातं आणखी मजबूत झालं.'

त्यावेळी झहीरनं विराटला सल्ला दिला होता की, 'तुमचं नातं कधीही लपवू नका, नातं लपवल्यास तुम्ही तणावात राहण्याची शक्यता जास्त असते.' झहीरच्या याच सल्ल्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी आपलं नातं लपवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. मागील चार वर्षापासून दोघंही एकत्र आहेत.

दरम्यान, या मुलाखतीत विराट अनुष्काबाबतही भरभरुन बोलला. 'जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून बरंच काही बदललं. तिच्यामुळेच मी सोशल मीडियापासून थोडं लांब राहणं शिकलो. सोशल मीडियावर तात्काळ एखाद्या विषयावर प्रतिक्रिया देणं टाळू लागलो. ज्याचा मला खरंच फायदा झाला.' असंही विराट यावेळी म्हणाला.

या मुलाखतीत विराट मैदानासह ड्रेसिंग रुमबाबतही विराटनं आपले अनुभव शेअर केले.