नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर वन डेत भारताने आठ धावांनी थरारक विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नागपूरच्या वन डेत त्याच्या कारकीर्दीतलं चाळीसावं शतक झळकावलं. त्याच्या या शतकाने सर्वाधिक शतकांची शर्यत आणखी चुरशीची बनवली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमापासून तो आता केवळ नऊ शतकं दूर आहे. तसंच तिसऱ्या क्रमाकांवरच्या रिकी पॉन्टिंगपेक्षा विराटच्या खजिन्यात आता दहा शतकं अधिक आहेत.


कोणाविरुद्ध किती शतकं?
विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 40 शतकं पूर्ण केली आहेत. यापैकी 33 शतकं ठोकलेल्या सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे. त्याने श्रीलंकेविरोधात सर्वाधिक आठ शतकं ठोकली आहे आणि प्रत्येक सामन्यात भारताचा विजय झाला आहे. तर वेस्ट इंडिजविरुद्ध आठ शतकं केली असून त्यापैकी पाच वेळा भारताने विजयाची चव चाखली आहे. नागपूरमध्ये मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धचं सातवं एकदिवसीय शतक लगावलं, त्यापैकी पाच सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

नागपूरमध्ये शतकं करण्याचा विक्रम कायम
यासोबतच विराट कोहलीने या मैदानावर एखाद्या भारतीय खेळाडूने शतक करण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. याआधी भारत संघ जेव्हा या मैदानावर खेळला आहे, तेव्हा एखाद्या फलंदाजाने शतक ठोकलंच आहे. कोहलीने हा विक्रम कायम ठेवला आहे. या मैदानावर दोन शतकं ठोकणारा विराट कोहली हा महेंद्रसिंह धोनीसह दुसरा फलंदाज ठरला आहे.

33 शतकांमुळे भारताचा विजय
कोहलीने केलेल्या 40 पैकी 33 शतकांनी भारताला विजयश्री खेचून आणला आहे. कोहलीने 133 डावांमध्ये ही 33 शतकं केली आहेत. यासोबतच त्याने सचिन तेंडुलकरच्या 231 डावांमधील 33 शतकांच्या (ज्यात भारताचा विजय झाला) विक्रमाशी बरोबरी केली आहे. रिकी पॉन्टिंग 25 शतकं (254 डाव), हाशिम अमला 24 शतकं (105 डाव), सनथ जयसूर्या 24 डाव (228 डाव) यांचा या यादीत समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 आंतरराष्ट्रीय शतकं
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचं हे सातवं एकदिवसीय शतक आहे. कांगारुंविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकं करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (9 शतकं) नावावर आहे. रोहित शर्मानेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी सात शतकं ठोकली आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीने 14 शतकं केली आहे. तर सचिन तेंडुलकरने त्याच्यापेक्षा जास्त म्हणजेच 144 डावात 20 शतक ठोकली आहेत.

सर्वात जलद 9000 धावा बनवण्याचा विक्रम
एकदिवसीय सामन्यात 40 शतकं बनवतानाच विराट कोहली कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वन डे आणि टी20) सर्वात जलद 9000 धावा बनवणारा
फलंदाज बनला आहे. कोहलीने केवळ 159 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता, त्याने कर्णधार असतान 204 डावांमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र आपल्या कारकीर्दीत कर्णधार म्हणून त्याने 15 हजार 440 धावा केल्या आहेत.

कसोटीमधील नंबर वन कायम
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतला नंबर वन कायम राखला आहे. पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आपल्या कामगिरीच्या बळावर दोघांमधलं रेटिंग गुणांचं अंतर कमी केलं आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराटच्या खात्यात सर्वाधिक 922 रेटिंग गुण असून, दुसऱ्या स्थानावरच्या विल्यमसनच्या खात्यात 915 रेटिंग गुण आहेत. विल्यमसनची ही गुणकमाई त्याच्या कारकीर्दीतली सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत भारतीय विजयाचा शिल्पकार ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने या क्रमवारीत तिसरं स्थान राखलं आहे. त्याच्या खात्यात 881 गुण आहेत.