मुंबई : विराट कोहली एक उत्तम फलंदाज आहे, मात्र कर्णधार म्हणून अजूनही त्याला सुधारणा करण्याची गरज आहे, असं मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केलं.


विराट कोहली हा माझ्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. प्रत्येक मालिकेत विराट कोहली विक्रम रचत आहे. क्षेत्ररक्षणातही तो अफाट कामगिरी करतो, मात्र जेव्हा कप्तान म्हणून विराट कोहलीकडे पाहतो, तेव्हा त्याने सुधारणा करण्याची गरज वाटते, असं आफ्रिदी म्हणाला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका अत्यंत रंजक होणार आहे. ऑसींना नमवण्यासाठी जी कौशल्यं लागतात, ती भारतीय संघाकडे आहेत. मात्र त्यांनी टीम म्हणून खेळायला हवं, असं आफ्रिदी 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघाकडून कसोटी मालिकेत पराभव स्वीकाराव्या लागल्यानंतर कोहलीच्या कर्णधारपदाविषयी साशंकता उपस्थित केली जात होती. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनीही कोहलीने टीमलीडर म्हणून बरंच काही शिकण्याची गरज असल्याचं मत मांडलं होतं.

कोहलीने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशातील 'रन'भूमीवर विजय मिळवल्यास त्याचं कर्णधारपद सिद्ध होईल, असं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं आहे. सहा डिसेंबरपासून सुरु होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका महत्त्वाची ठरणार आहे.