वर्धा : आर्वी येथे भाजी बाजार भरत असलेल्या इंदिरा चौक परिसरातील जागेवर नगर परिषदेने सौंदर्यीकरण आणि पार्किंग व्यवस्थेसाठी बांधकाम करण्यात निर्णय घेतला आहे. या विरोधात भाजी व्यावसायिकांनी गेल्या चार दिवसांपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.


भाजी बाजार बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होतेच आहे, मात्र त्याचसोबत भाजी उत्पादक शेतकऱ्यांनही फटका बसत आहे.

चार दिवसांपासून भाजी बाजार बंद असल्याने, थेट नगरसेवक आणि नगराध्यक्षच मैदानात उतरले आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जुन्या बस स्टँडसमोर भाजी विक्री केली. यावेळी नागरिकांनीही गर्दी करत भाजी खरेदी केली. बाजाराचा दिवस असल्याने आज अमरावती येथून भाजीपाला विकण्यासाठी आला होता.

दरम्यान, एकीकडे भाजी विक्रेते हे बेमुदत बंदवर ठाम आहेत, तर दुसरीकडे विक्रेते हे विकास कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष यांनी केला आहे.

विकासकामांचा फटका भाजी विक्रेत्यांना बेरोजगार करणारा ठरत असल्याने आम्ही आमच्या हक्कासाठी लढत असल्याचं भाजी आणि फळ विक्रेत्यांच म्हणणं आहे. पण दोघांच्या भांडणात त्रास मात्र सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.