मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी एका इंजिनिअर तरुणानं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे. अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी आणि लालचंद राजपूत यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी यासाठी अर्ज केला आहे. पण त्याच दरम्यान 30 वर्षाच्या उपेंद्रनाथ ब्रह्मचारी या तरुणानेही अर्ज केला आहे.


मेकॅनिकल इंजिनिअर असणाऱ्या उपेंद्रनाथनं बीसीसीआयच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला वठणीवर आणण्यासाठी हा अर्ज भरल्याचा दावा त्याने केला आहे.

देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांप्रमाणे त्यालाही वाटतं आहे की, अनिल कुंबळेच्या राजीनाम्यामागे विराट कोहलीच जबाबदार आहे.

त्यानं दाखल केलेल्या अर्जामध्ये अनेक चुकाही आहेत. या हास्यापद अर्जात उपेंद्रनाथ म्हणतो की, 'भारतीय क्रिकेटर अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर मी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, मला असं वाटतं की, भारतीय कर्णधार विराट कोहलीला प्रशिक्षक म्हणून एक महान खेळाडू नकोय.'

'तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं पुढे असंही म्हटलं की, 'सीएसीनं कोणत्याही माजी क्रिकेटरला प्रशिक्षक म्हणून निवडलं तरी विराट कोहली त्याचा अपमानच करेल आणि त्याचाही गत अनिल कुंबळे प्रमाणेच होईल.' असंही उपेंद्रनाथ म्हणाला.

एवढ्यावरच तो थांबला नाही तर आपण अर्ज का करत आहोत याचंही कारण त्यानं स्पष्ट केलं आहे.  'मी कोणत्याही प्रकारच्या अंहकारी व्यक्तीशी जुळवून घेऊ शकतो. पण इतर कोणताही महान खेळाडू असं करु शकत नाही. हळूहळू मी त्याला ताळ्यावर आणेल. त्यानंतर बीसीसीआयनं एखाद्या महान खेळाडूला मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमावं.' अशी बढाईही त्यानं या अर्जात मारली आहे.

दरम्यान, बीसीसीआयकडून या व्यक्तीचा विचार केला जाणार नाहीच. पण तरीही अशाप्रकारची अनेक लोकं बीसीसीआयला अर्ज करत असल्याचं दिसून येत आहे.