कोलंबो : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. मात्र दिनेश कार्तिकचा हा विजयी षटकार कर्णधार रोहित शर्माने मिस केला.


हा षटकार का पाहता आला नाही, त्याचं स्पष्टीकरण रोहित शर्माने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं. ''सुपर ओव्हर होईल, असं वाटत होतं. म्हणून ड्रेसिंग रुममध्ये पॅड बांधण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे हा विजयी षटकार मिस झाला,'' असं रोहित शर्माने सांगितलं.

''दिनेश कार्तिकची खेळी पाहून आनंद वाटला. त्याला आतापर्यंत कधीही पुरेसा वेळ मिळाला नाही, मात्र त्याने त्याची क्षमता सिद्ध केली. त्याच्या याच क्षमतेमुळे त्याला खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. कारण, त्याचा अनुभव कामी येईल, याची आम्हाला खात्री होती,'' असं रोहित शर्मा म्हणाला.

दिनेश कार्तिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का पाठवलं, याचं उत्तर कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर दिलं. ''अखेरच्या षटकांमध्ये मुस्ताफिजुर गोलंदाजीसाठी येईल हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे कार्तिकसारखा अनुभवी फलंदाज त्याचा सामना करण्यासाठी असावा,'' अशी रणनिती होती, असं रोहित शर्मा म्हणाला.

अगदी त्याचप्रमाणे दिनेश कार्तिकने रोहित शर्माचा निर्णय योग्य ठरवला आणि अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत विजय खेचून आणला.

संबंधित बातम्या :

विजयी षटकार ठोकणाऱ्या दिनेश कार्तिकला संघातून बाहेर जाण्याची भीती


तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदासह गुणवान शिलेदारही मिळाले!


विजयी षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे अखेरचे सहा चेंडू