ठाणे : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी सामने व्हावेत, यासाठी ठाणे महापालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. स्टेडियममधील विकेट आणि आऊटफिल्ड बनवण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत.


स्टेडियममध्ये शालेय किंवा इतर स्तरावरील सामने भरवले जातात. मात्र रणजी सामने या स्टेडियममध्ये होत नसल्याने क्रिकेटपटूंमध्ये नाराजीचा सूर आहे.

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर 1982-83 ते 1995-96 या कालावधीत केवळ सहा सामने झाले होते. मुंबई संघाच्या बडोदा, गुजरात, महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघाबरोबर लढती झाल्या होत्या, अशी माहिती सांगितली जाते.

मात्र त्यानंतरच्या 20 वर्षांच्या कालावधीत या स्टेडियममध्ये एकही रणजी क्रिकेट सामना होऊ शकला नाही. यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी एकूण 2 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात येणार आहे.