Team India :वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे 18 जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार झाले आहेत. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचे लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स करंडक जिंकण्याकडे लागले आहे. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन करणार आहे तर संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार हा असणार आहे.


भारतीय क्रिकेट इतिहासात असं पहिल्यांदाच झालं आहे की टीम इंडिया एक सोबत दोन सीरिज खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम या दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथं टीम इंडिया न्यूझीलॅंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर दुसरीकडे याच काळात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. यामुळंच श्रीलंका दौऱ्यात त्याच खेळाडूंना जागा मिळाली आहे जे भारतीय कसोटी संघात सहभागी नाहीत.  


अंतिम सामन्यासाठी भारताच्या 15 सदस्यांच्या संघाची घोषणा 
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या 15 सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली. 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार झाले आहेत. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचे लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स करंडक जिंकण्याकडे लागले आहे. या फायनलनंतर टीम इंडियाचा हा चमू इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. 


अंतिम सामन्यात कुणाला मिळाली संधी?
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश आहे.


13 ते 25 जुलैदरम्यान श्रीलंका दौरा 
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन करणार आहे तर संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार हा असणार आहे. संघामध्ये आयपीएलमध्ये चमकलेल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडसह वेगवान गोलंदाज चेतन सकारिया, नितीश राणा, देवदत्त पडिकल आणि कृष्णप्पा गौतम यांचा पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश केला गेला आहे. भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका तर तीन सामन्यांची  टी20 मालिका खेळणार आहे. भारतीय टीम श्रीलंकेमध्ये 13 ते 25 जुलै दरम्यान तीन वनडे आणि तीन टी20  सामन्यांची मालिका खेळणार आहे. 13, 16 आणि 18 जुलै रोजी एकदिवसीय तर  21, 23 आणि 25 जुलै रोजी टी 20 सामने खेळले जाणार आहेत. हे सामने कुठे खेळले जाणार याबाबत अद्याप घोषणा केलेली नाही.  
 
श्रीलंका दौऱ्यात या खेळाडूंना संधी
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियामध्ये फलंदाजाच्या यादीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. तर ऑलराउंडर म्हणून हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि के गौतम यांचा समावेश केला आहे. तर गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, राहुल चहर आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे.