कोलंबो : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.


कोलंबोत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात बांगलादेशने भारताला विजयासाठी 167 धावांचं लक्ष्य दिलं होतं. अटीतटीच्या या सामन्यात दिनेश कार्तिकने विजय खेचून आणला. त्याने 8 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

दिनेश कार्तिकसोबतच भारताकडून रोहित शर्मा 56, लोकेश राहुल 24, मनीष पांडे 28 आणि विजय शंकरने 17 धावांचं योगदान दिलं. मात्र विजयाचा खरा हिरो ठरला तो दिनेश कार्तिक.

त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 20 षटकांत 8 बाद 166 असं रोखून आपली कामगिरी चोख बजावली. लेग स्पिनर यजुवेंद्र चहल हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत 18 धावा मोजून तीन फलंदाजांना माघारी धाडलं. जयदेव उनाडकटने 33 धावांत दोन, तर वॉशिंग्टन सुंदरने 20 धावांत एक विकेट घेऊन त्याला छान साथ दिली.