मुंबई : स्वच्छतेचा संदेश देण्याच्या नादात टीम इंडियाच्या खेळाडूंनी चक्क पाण्याची भरलेली बॉटलच कचऱ्याच्या डब्यात टाकली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'स्वच्छता ही सेवा' या मोहिमेचा पाठपुरावा करण्याच्या नादात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना पाणी वाचवण्याचा मात्र विसर पडलेला दिसत आहे.

बीसीसीआयनं दुपारी एक वाजून 52 मिनिटांनी ट्विट केलेल्या चित्रफितीत रवी शास्त्री, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पंड्या यांच्याकडून पाण्यानं भरलेली बाटली रिले थ्रो होत विराट कोहलीच्या हातात येते. आणि मग ती बाटली कचऱ्याच्या डब्यात टाकून विराट म्हणतो की, कचऱ्यासाठी डस्टबीनशिवाय दुसरी योग्य जागा नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यानंतर रवी शास्त्री विराटला दुजोरा देतो. टीम इंडियाच्या स्वच्छतेसाठीच्या प्रयत्नांबद्दल शंका नाही, पण आपण कचऱ्याच्या डब्यात फेकलेली बाटली ही पाण्यानं भरलेली आहे याचा भारतीय क्रिकेटवीरांना विसर का पडावा?

पाहा व्हिडीओ :

https://twitter.com/BCCI/status/914405122469281794