हैदराबाद कसोटी : भारताला विजयासाठी 7 विकेट्सची गरज
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2017 05:34 PM (IST)
हैदराबाद : भारताने हैदराबाद कसोटीत बांगलादेशला विजयासाठी 459 धावांचं आव्हान दिलं आहे. त्याचा पाठलाग करताना बांगलादेशची अवस्था चौथ्या दिवसअखेर तीन बाद 103 धावा अशी झाली. आता अखेरच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 356 धावांची आवश्यकता आहे, तर भारताला हा सामना जिंकण्यासाठी सातच विकेट्स हव्या आहेत. या सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने शतक साजरं केलं. रहिमच्या शतकी खेळीच्या जोरावरच बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद 388 धावांची मजल मारली होती. पण भारताला पहिल्या डावात 299 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाने बांगलादेशला फॉलोऑन दिला नाही आणि चार बाद 159 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला होता. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडिअमवर सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेशने आजच्या दिवसाची सुरुवात सहा गडी बाद 322 वरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. यानंतर भुवनेश्वर कुमारनं बांग्लादेशला पहिला झटका देत नाबाद 51 धावांवर खेळत असलेल्या मेहदी हसन याचा त्रिफळा उडवला. हसनने रहीमच्या साथीनं सातव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. यानंतर खेळायला मैदानात उतरलेल्या तैजुल इस्लामला उमेश यादवनं रिद्धीमान सहाकडून 10 धावांवर झेलबाद करुन तंबूत पाठवलं. तर रवींद्र जडेजानंही तास्किन अहमदला रिद्धीमान सहाकडं झेलबाद करुन 8 धावा पुन्हा तबूंत पाठवलं. रविचंद्रन अश्विनने शेवटची विकेट घेत 127 धावांवर रहीमला रिद्धीमान सहाकडून झेलबाद केलं. त्याच्या या विकेटनं अश्विननं आपला कसोटी कारकीर्दीतील 250 बळी घेण्याचा आकडा पार केला.