गुवाहटी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर नेहमी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी सल्लामसलत करताना दिसतो. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात धोनीकडूनही एक अशी चूक झाली, जी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरु शकली असती.


डीआरएसचा वापर न करणं टीम इंडियाला महागात पडलं. पाचव्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हेनरिक्स फलंदाजी करत असताना चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करुन धोनीच्या हातात गेला. सर्व खेळाडूंनी यासाठी अपील केली. मात्र पंचांनी बाद नसल्याचा निर्णय दिला.

https://twitter.com/animesh452/status/917781943717998592

यानंतर विराटने तातडीने धोनीचा सल्ला घेतला. मात्र धोनीने डीआरएसची गरज नसल्याचं सांगितलं. काही वेळानंतर टीव्ही रिप्लेमध्ये दाखवल्यानंतर स्पष्ट झालं की, हेनरिक्स बाद होता. त्यामुळे टीम इंडियाने डीआरएसचा वापर केला असता तर हेनरिक्सला माघारी परतावं लागलं असतं.

ऑस्ट्रेलियाच्या विजयात हेनरिक्सने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. केवळ 2 धावांवर असताना मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत त्याने नाबाद 62 धावा केल्या. हेनरिक्सच्या या खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.