सुरेश रैनाला सूर गवसला, 49 चेंडूत शतक
एबीपी माझा वेब टीम | 22 Jan 2018 03:05 PM (IST)
रैनाने 59 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये 13 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
कोलकाता : टीम इंडियातून अनेक दिवसांपासून बाहेर असलेल्या सुरेश रैनाला अखेर सूर गवसला आहे. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यात त्याने केवळ 49 चेंडूत शतक पूर्ण केलं. रैनाने 59 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये 13 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. बंगाल विरुद्ध उत्तर प्रदेश या सामन्यात सुरेश रैनाच्या शतकी खेळीच्या जोरावर उत्तर प्रदेशने बंगालला विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं आहे. उत्तर प्रदेशने 3 बाद 235 धावा केल्या. सुरेश रैनासोबतच एडी नाथनेही 43 चेंडूत 80 धावांची खेळी केली. सुरेश रैनाला आयपीएलमध्ये दोन वर्षांनी पुनरागमन करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने रिटेन केलं आहे. शिवाय त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुराही सोपवण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलपूर्वी सुरेश रैनाला सूर गवसला आहे.