बंगळुरु: बंगळुरुतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तसंच मालिकेत 1-1नं बरोबरीही साधली. पण या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथवर बरीच टीका सुरु आहे.


ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 188 धावांची गरज होती. मात्र, ऑस्ट्रेलियाचे गडी झटपट बाद होत होते. त्यावेळी कर्णधार स्मिथ एका बाजूनं खिंड लढवत होता. पण उमेश यादवच्या एका चेंडूवर स्मिथला पायचीत बाद देण्यात आलं. त्यानंतर स्मिथ थेट ड्रेसिंग रुमकडे वळून डीआरएस घेऊ की नको? इशाऱ्यानं विचारलं. आयसीसीच्या नियमानुसार, डीआरएसबाबत फक्त मैदानावर उपस्थित असलेल्या खेळाडूंना विचारुनच निर्णय घेतले जातात. त्यामुळे अशा पद्धतीनं वागणं हे चुकीचं आहे. दरम्यान, या प्रकरणी कर्णधार कोहलीनं पंचांकडे याबाबत तक्रारही नोंदवली.

सामन्यानंतर याप्रकरणी बोलताना विराट म्हणाला की, 'आम्ही डीआरएसचा सतत योग्य वापर करु शकत नसलो तरी याबाबतचे निर्णय आम्ही मैदानावर चर्चा करुन घेतो. त्यासाठी आम्ही ड्रेसिंग रुमकडे विचारणा करत नाही. मी फलंदाजी करतानाही पाहिलं की, ऑस्ट्रलियाचे खेळाडू डीआरएस घेण्याआधी वर (ड्रेसिंग रुमकडे) पाहत होते. तेव्हा देखील मी पंचांना याबाबत सांगितलं.'

दरम्यान, या प्रकरणी पत्रकार परिषदेत स्मिथला विचारलं असता त्याने 'मला लक्षात नाही.' असं उडवाउडवीचं उत्तर दिलं.

VIDEO: