नवी दिल्ली : प्रदूषणामुळे दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर सुरु असलेला भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. मात्र खेळ पूर्णपणे थांबवण्यास पंचांनी नकार दिला. त्यामुळे प्रदूषणाने त्रस्त झालेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना मास्क लावून खेळावं लागलं.


गेल्या दोन दिवसांपासूनच दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे पाहुण्या संघावर मास्क लावून खेळण्याची वेळ आली आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंनी खेळ थांबवण्याची विनंती केली. मात्र पंचांनी याला नकार दिला.

कर्णधार विराट कोहलीच्या 243 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने दिल्ली कसोटीत पहिल्या डावात 7 बाद 536 धावा केल्या. भारताने 536 धावांवर आपला डाव घोषित केला. या धावसंख्येमध्ये सलामीवीर मुरली विजय 155, विराट कोहली 243 आणि रोहित शर्मा 65 यांची सर्वात मोठी भागीदारी आहे.