जोहान्सबर्ग : जोहान्सबर्गचा तिसरा कसोटी सामनाही जिंकून दक्षिण आफ्रिका टीम इंडियाला व्हाईटवॉश देईल, असा विश्वास वेगवान गोलंदाज कागिसो रबादाने व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताला नमवून, मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.


त्या पार्श्वभूमीवर रबादा म्हणाला की, भारताच्या वेगवान आक्रमणाविषयी आमच्या मनात आदर आहे. आमच्या फलंदाजांना वेगवान गोलंदाजी कशी खेळायची याची कल्पनाही आहे. त्यात एकदा का जिंकायची चटक लागली की तुम्ही प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे जोहान्सबर्गची तिसरी कसोटी जिंकून टीम इंडियाला व्हाईटवॉश देण्याचा आमचा प्रयत्न राहिल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधली तिसरी कसोटी 24 जानेवारीपासून जोहान्सबर्गच्या न्यू वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे किमान शेवट गोड करण्याचा तरी भारतीय संघाचा प्रयत्न असेल.