केपटाऊन : विराट कोहलीच्या टीम इंडियाला केपटाऊन कसोटीत अखेर लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.


या कसोटीत तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. पण प्रतिस्पर्धी संघांच्या वेगवान गोलंदाजांनी चौथ्या दिवसाच्या खेळावर निर्विवाद गाजवलं.

आधी भारताच्या वेगवान चौकडीने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत गुंडाळला. त्यामुळे टीम इंडियासमोर विजयासाठी 208 धावांचंच लक्ष्य होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 135 धावांतच आटोपला.

गोलंदाजांनी सावरलं, मात्र फलंदाजांची दमछाक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली केपटाऊन कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला 208 धावांची गरज होती. भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत गुंडाळला. त्यामुळे पहिल्या डावातील 77 धावांच्या पिछाडीमुळे, भारतासमोर 208 धावांचं लक्ष्य होतं.

आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 तर भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. मात्र फलंदाजांना 208 धावांचं लक्ष्य गाठण्यात अपयश आलं.

आफ्रिकेने आज दोन बाद 65 धावांवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र त्यांचा हुकमी फलंदाज हाशिम आमलाला मोहम्मद शमीने माघारी धाडून आफ्रिकेला गळती लावली. आमलाने 4 धावा केल्या. मग नाईट वॉचमन रबाडालाही शमीनेच बाद केलं.

त्यानंतर बुमराने कर्णधार ड्युप्लेसिला भोपळाही फोडू दिलं नाही, तर डिकॉकला अवघ्या 8 धावांवर माघारी धाडलं. तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन डिव्हिलियर्सने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आलं नाही.

डिव्हिलियर्सच्या रुपाने आफ्रिकेची दहावी विकेट गेली. डिव्हिलियर्सने 35 धावा केल्या. त्याला बुमराने भुवनेश्वरकरवी झेलबाद केलं.